Tuesday, February 8, 2011

परसबागेतील भाजीपाल्याला चव न्यारी...

मी लातूर शहरात बारा वर्षांपूर्वी घर बांधले. घराच्या बाजूला शिल्लक जागेत लॉन व भाजीपाला लागवडीचे नियोजन केले. बागेच्या दोन कोपऱ्यांत सेंद्रिय खताचे खड्डे घेतले. घरातील चौघांना पुरतील अशा पद्धतीने भाजीपाला लागवडीचे नियोजन केले. घर बांधण्याच्या काळात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष होते. त्या वेळी घेतलेली कूपनलिका कोरडी निघाली. पुढच्या काळातील पाण्याच्या संकटाची ही नांदी होती. म्हणून छतावरील सर्व पाणी व उघड्या प्लॉटमधील जादाचे पाणी बोअर भोवती मुरविण्यासाठी पाच ु चार फुटांचा फिल्टर खड्डा पाणी मुरण्यासाठी तयार केला. त्या खड्ड्यामध्ये लहान- मोठे दगड, वाळू भरून फिल्टर चेंबर बनविला. अशा तऱ्हेने पहिल्या पावसात बोअरचे पुनर्भरण झाले. त्यामुळे आजपर्यंत कूपनलिकेचे पाणी कमी झाले नाही.

भाजीपाल्याचे नियोजन :
घरातील तांदूळ, डाळी, भाज्या, धुतलेले पाणी परसबागेतील भाज्यांना वापरतो. तसेच भांडी धुतलेले पाणी देखील झाडांना वापरले जाते. सध्या माझ्याकडे जूनपासून भेंडी, वांगी, गवार, फुलकोबी, पत्ताकोबी, नवलकोल, चवळी या भाज्या दर महिन्याला थोड्या थोड्या लावल्या जातात. कंपाउंडवर कारले, तोंडले, दोडके, हिरवा भोपळा लागवड केली जाते. परसबागेत थोड्या भागात पालकाची दर महिन्याला नवीन लागवड करतो. कांदा, मेथी बरोबरीने वाफ्यामधील मधल्या मोकळ्या जागेत कोथिंबीरही वर्षभर ताजी मिळते.

बागेत एक लिंबाचे आणि कढीपत्त्याचे झाड आहे. आवळा, अंजिराचे झाड लावले आहे. परसबागेत भाजीपाला लागवड करण्यासाठी हंगामानुसार कोकोपीटने भरलेल्या ट्रेमध्ये रोपे करून घेतो. रोपे योग्य कालावधीची झाल्यावर बागेतील वाफ्यात लावतो.

थोड्या सावलीच्या कोपऱ्यात आले, पुदिना, गवती चहा लागवड केली आहे. सांडपाण्याचा वापर अळूसाठी केला आहे. भाजीपाल्याच्या बरोबरीने निशिगंध, अबोली, मोगरा, सदाफुली, जास्वंद, शेवंती लागवड केली आहे. कुंड्यांत गुलाब व इतर फुलांची शोभेची झाडे लावली आहेत. कंपाउंडच्या कडेने तुळशीची रोपे, कोरफड, गुळवेल, अश्‍वगंधा लागवड केलेली आहे. टोमॅटो, मिरची, झेंडू, शेवगा, स्वीट कॉर्न, मका याचीही लागवड बागेत केली आहे. फुलझाडे, भाजीपाला आणि फळझाडांना मी रासायनिक खतांचा वापर करीत नाही.

हंगामी भाज्या काढल्यानंतर राहिलेली खोडे, पानांचे तुकडे करून सेंद्रिय खतनिर्मितीच्या खड्ड्यात टाकतो. तसेच शेणखत, खरकटे अन्न खड्ड्यातच जिरविले जाते. खड्ड्यामध्ये गांडुळे सोडली आहेत, त्यामुळे खत लवकर तयार होते. हे तयार झालेले सेंद्रिय खत दर दोन महिन्यांनी भाजीपाला, फळझाडांना देतो. भाजीपाल्यावर सहसा कुठली रोग-कीड पडत नाही. कीड, रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला तर लिंबोळी अर्क फवारतो. रोगग्रस्त पाने पुरून टाकतो. दररोज बागेत झाडाचे निरीक्षण असते. त्यामुळे कोणाच्या शेजारी कोणती कीड येते. कशावरचा रोग दुसऱ्यावर पसरतो हे कळते.

आनंददायी बाग...
आपल्याला पुरेल व एकानंतर दुसरी भाजी उपलब्ध होईल अशा पद्धतीने भाजीपाला लागवड केली जाते. त्यामुळे फार फार तर महिन्यात एखादी दुसरी भाजी आणावी लागते. शिल्लक भाजी राहिली तर शेजाऱ्यांना देतो. असा वर्षभर मिळणारा सेंद्रिय ताजा भाजीपाला हा चवदार व पौष्टिक तर आहेच, त्याचबरोबरीने आर्थिक बचतही होते. फावल्या वेळेत बागेची मशागतही होते. परसबागेमुळे घराचा परिसर सुंदर राहतो. लॉन भोवती फुलझाडे असल्याने मुलांना खेळायला जागा झाली आहे. बागेतील झाडावर चिमण्या, कावळे वेगवेगळ्या हंगामांतले पाहुणे पक्षी चिवचिवतात, झाडावर त्यांच्यासाठी मडक्‍यात पाणी ठेवतो, तसेच पक्ष्यांना खाण्यासाठी दाणेही ठेवतो. त्यामुळे वेगवेगळे पक्षी बागेत पाहायला मिळतात.

- रमेश चिल्ले, लातूर

3 comments:

  1. रमेश जी लेख उत्तम आहे .सोबत छाया चित्रे टाकले असते तर अति उत्तम .

    ReplyDelete
  2. लातूर ला नेहमी येणे होते.
    वर्णन वाचुन प्रत्यक्ष परसबाग पाहण्याची इच्छा होतेय
    दीपक माने औरंगाबाद

    ReplyDelete
  3. लातूर ला नेहमी येणे होते.
    वर्णन वाचुन प्रत्यक्ष परसबाग पाहण्याची इच्छा होतेय
    दीपक माने औरंगाबाद

    ReplyDelete