Friday, February 4, 2011

आले मूल्यवर्धन आणि प्रक्रिया प्रशिक्षण

धियाना (पंजाब) येथील सिफेट या संस्थेने आले पिकातील मूल्यवर्धन व प्रक्रिया विषयावर नुकताच प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. आल्याचे वाढते व्यापारी मूल्य लक्षात घेता अशा स्वरूपाच्या प्रशिक्षणाची संधी शास्त्रज्ञांकडून इच्छुकांना दिली जात आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यमातून (आयसीएआर) जागतिक बॅंकेच्या साह्याने राष्ट्रीय कृषी नवनिर्मिती प्रकल्प राबवला जात आहे. आयसीएआर तसेच राज्य कृषी विद्यापीठे यांनी विकसित केलेल्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या आधारे पोषणाने परिपूर्ण तसेच आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पिकांमध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे. लुधियाना (पंजाब) येथील सिफेट या पीक काढणीपश्‍चात तंत्रज्ञान विषयातील संस्थेमध्येही या प्रकल्पाचे काम सुरू आहे. मूल्यवर्धन तसेच पीक काढणीपश्‍चात व्यवस्थापन या विषयासाठी ज्ञानाचे केंद्र म्हणून संस्थेचा सहभाग आहे.
सध्या हळद पिकाला चांगलेच भरभराटीचे दिवस आले आहे. हळदीचे वाढते व्यापारी मूल्य पाहता त्यावरील प्रक्रियायुक्त तंत्रज्ञानाच्या विकासाला अधिक संधी आहे. ही गरज ओळखून सिफेटतर्फे या पिकात याविषयी नऊ दिवसांचा तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम अलीकडेच घेण्यात आला. त्याला ओरिसा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
आले हे औषधी गुणधर्मासाठी तसेच मसालेवर्गीय पीक म्हणून लोकप्रिय आहे. देशातील दक्षिण व पूर्वेकडील राज्यांमध्ये त्याची प्रामुख्याने लागवड होते. देशातील 25 टक्के उत्पादनाचा हिस्सा या भागातील आहे. सध्या अन्नप्रक्रिया उद्योगाकडून आल्याच्या स्वादयुक्त घटकाला मोठी मागणी आहे. हे महत्त्व लक्षात घेऊनच प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. आल्याची साठवणूक क्षमता तसेच निर्यातमूल्य वाढविण्यासाठी या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभव मिळावा यासाठी मार्कफेड तसेच अमृतसर येथील एका कंपनीच्या भेटीचा लाभ घडविण्यात आला. आल्याची पावडर तयार करणे, त्यातील ओलेओरेझीन, लोणचेनिर्मिती, आले पॅकेजिंगसाठी नॅनो घटक, सुकवणी यंत्राचे कार्य व देखभाल, कमी खर्चातील साठवणूक आदींविषयी सविस्तर माहिती या वेळी प्रशिक्षणार्थींना मिळाली.
आल्याला दरही चांगला मिळू लागला आहे. साहजिकच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कलही या पिकाकडे चांगल्या प्रकारे वळतो आहे. आल्याच्या बेण्याची कमतरताही अनेक शेतकऱ्यांना भेडसावत असून केवळ बेणे विकूनही शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न कमावण्याची संधी मिळत आहे. गादीवाफा पद्धत तसेच ठिबक किंवा तुषार सिंचन यांच्या वापराने आल्याचे उत्पादन व गुणवत्ता वाढविण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. शेतकरी गटांच्या माध्यमातून या पिकाच्या लागवडीसाठी प्रेरित झाले आहेत.

No comments:

Post a Comment