Friday, February 4, 2011

काटेकोर शेती ठरली चांगलीच फायद्याची

राजमणी हा तमिळनाडू राज्यात कोइमतूर जिल्ह्यात पुल्लागौंदन पुडूर गावातील युवा शेतकरी आहे.
काटेकोर शेती पद्धतीतून त्याने आता चांगला नफा मिळवीत आर्थिक स्थैर्य कमावले आहे.
राजमणी पारंपरिक शेती करायचा, त्यातून मिळणारे उत्पन्न अगदी तुटपुंजे होते.
तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या विस्तार संचालनालयाने एकेदिवशी घेतलेल्या काटेकोर शेती (प्रिसिजन फार्मिंग) या विषयावरील प्रशिक्षणात त्याने भाग घेतला. त्यानंतर फलोत्पादन विभागाकडे त्याने पुढील सल्ल्यासाठी संपर्क केला. अधिक नफ्याची शेती करण्यासाठी ही शेती त्याला उपयुक्‍त वाटली. त्याने कांदा, टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, मिरची व हळद अशा पिकांचे नियोजन करायचे ठरवले.
शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनातून त्याने शेतीची आखणी केली.

दीड एकर क्षेत्रावर त्याने हळद घेतली. चांगली नांगरणी केल्यानंतर त्यामध्ये 25 टन प्रति हेक्‍टर शेणखत, तर 300 किलो डीएपी व 150 किलो पोटॅश यांचा बेसल डोस म्हणून वापर केला. हळदीसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. धर्मपुरी व कृष्णगिरी येथील शेतकऱ्यांच्या पद्धतींचा अभ्यास करून त्यांचे अनुकरण आपल्या शेतात केले.

हळदीच्या शेतात त्याने कोथिंबीर घेतलीच, शिवाय हळदीच्या सहा ओळींनतर दोन ओळी कांदा हे देखील आंतरपीक घेतले. तणांच्या नियंत्रणासाठी तणनाशके, तसेच किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कीडनाशकांचा वापर केला.

लावणीनंतर 30 ते 35 दिवसांत त्याने कोथिंबिरीचे उत्पादन घेतले. कांदा, तसेच मिरचीचेही नियोजन केले असल्याने त्यांचेही उत्पादन मिळाले. या पीकपद्धतीत एक हेक्‍टर क्षेत्रात हळदीचे सात टन, कांद्याचे 13 टन, मिरचीचे दोन टन उत्पादन राजमणीला मिळाले. हळद 135 रुपये प्रति किलो याप्रमाणे विकण्यात आली. कांदा 20 रुपये, तर मिरचीला 12 रुपये प्रति किलो दर मिळाला.

कोथिंबिरीची चार रुपये प्रति किलो या दराने विक्री झाली. खते, पाणी यांचा शिफारशीप्रमाणे योग्य वेळी योग्य वापर झाला. राजमणीला हेक्‍टरी तीन लाख 35 हजार 400 रुपये खर्च आला, तर नऊ लाख 66 हजार रुपयांचा नफा हळद, कांदा, मिरची, कोथिंबीर व कुंपण म्हणून घेतलेली तूर यापासून मिळाला. काटेकोर शेती पद्धतीचे महत्त्व त्याला पटले असून, या शेतीतून आर्थिक स्थैर्य मिळवणे त्याला शक्‍य झाले आहे.

No comments:

Post a Comment