शेत व पडीक जमिनीवरही बांबू लागवड यशस्वीपणे करता येते. त्यासाठी लागवडीच्या पद्धती, पीक संरक्षण आणि बांबू कापणी करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. याविषयीची माहिती करून घेतल्यास बांबूपासून चांगले उत्पादन मिळविता येईल.
बांबूच्या लागवडीसाठी किमान नऊ अंश से. तापमानाची आवश्यकता असते. बांबूच्या व्यावसायिक पद्धतीने लागवडीसाठी साधारणतः खोल गाळाची व पाण्याचा निचरा होणारी जमीन उपयुक्त असल्याचे आढळून आलेले आहे. बांबू लागवडीच्या दोन पद्धती आहेत : १) कंद काढून लागवड करणे. २) बियांपासून रोपे तयार करून लागवड करणे. याशिवाय उतिसंवर्धन पद्धतीने बांबूची अभिवृद्धी यशस्वी ठरलेली आहे.
कंदाद्वारे लागवड ः
बांबूच्या वाढणाऱ्या खोडास कंद असे म्हणतात. एक वर्षाच्या आतील दोन-तीन बांबू काढून लागवडीच्या ठिकाणी जमिनीत गाडून लावावे. जमिनीच्या वर १०-१२ सें.मी. बांबू ठेवून त्यावरील भाग छाटावा. किमान दोन-तीन डोळे असणारा कंद लागवडीकरिता वापरावा.
बियांपासून बांबूची लागवड ः
रोपवाटिकेत पिशव्यांमध्ये किंवा गादी वाफ्यावर रोप तयार करून लागवडीसाठी वापरता येतात. पेरणीसाठी बियाण्याला कुठल्याही प्रकारची पूर्वप्रक्रिया करण्याची आवश्यकता नसते; परंतु उधईपासून बियाण्याचे संरक्षण करण्यासाठी पेरणी करताना गादी वाफ्यावर दहा टक्के लिंडेन पावडर शिंपडावी. पेरणीनंतर दहा दिवसांत बियाण्याची उगवण होते. नवीन बियाण्याची उगवणक्षमता ७० टक्क्यांपर्यंत असते. डब्यात बियाण्याची साठवण केल्यास आठ ते दहा महिन्यांपर्यंत बियाणे पेरणीसाठी वापरता येते.
पेरणीची वेळ ः
ज्या ठिकाणी पेरणीसाठी बियाणे उपलब्ध आहे, अशा ठिकाणी मार्च, एप्रिल महिन्यांत पेरणी करावी. एक हेक्टर क्षेत्रासाठी ३०० ग्रॅम बियाणे पुरेसे होते. शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीत लागवड करावयाची असल्यास त्या ठिकाणी उन्हाळ्यात पाच मीटर अंतरावर आखणी करून ६० ु ६० ु ६० सें.मी. आकाराचे खड्डे खोदून ठेवावे. पावसाळ्याच्या सुरवातीस भुसभुशीत माती व एक आगपेटी भरून दहा टक्के लिंडेन पावडर टाकून खड्डा भरून घ्यावा. पावसाला सुरवात झाली म्हणून पिशवीतील रोपांच्या मुळांना इजा होणार नाही, अशा तऱ्हेने मातीसह काढून खड्ड्यात लागवड करावी.
बांबू बेटाची जोपासना व मशागत ः
लागवड झाल्यावर प्रथम वर्षी महिन्यातून एकदा नियमितपणे रोपाभोवतीचे तण काढून माती हलवून घ्यावी आणि रोपांना मातीची भर द्यावी. यामुळे कंद जोमाने वाढण्यास मदत होते. निंदणी आणि भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करावे. कंदापासून लागवड केल्यास बांबूचे बेट दुसऱ्याच वर्षी तयार होते व पाच-सहा वर्षांत उत्पादनास सुरवात होते. बांबू जमिनीतल्या मूळ खोडापासून वाढतात. त्यामुळे खोडापासून प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नवीन कोंब फुटतात. ज्या दिशेस कोंब फुटतात, त्याला "चाल' म्हणतात. बांबू बेटातील कळकांची वाढ झपाट्याने होते आणि ती एका वर्षात पूर्ण होते. मुली जातीचा बांबू सोडल्यास सर्व बांबूच्या जाती एकत्र बेट किंवा रांजी बनवून वाढतात. बांबूच्या बेटाचे आयुष्य ३० ते ६० वर्षांपर्यंत असते. आयुष्याच्या संपुष्टीनंतर बांबूस फुले येतात. अशा वेळेस बांबू वनातील सर्व बांस वाळतात व मरतात. बियांपासून नवीन रोपे तयार होतात व बांबू वनाचे पुनरुज्जीवन होते. दर वर्षी येणारे नवीन कोंब जतन करून त्यांना वाढायला आधार आणि वाव देऊन फक्त पक्के असे कळक ठराविक पद्धतीने तोडल्यास व मूळ खोडास कोणतीही इजा न पोचविल्यास बांबूच्या बेटापासून त्याच्या स्वाभाविक आयुष्यमानापर्यंत सातत्याने उत्पादन मिळू शकते.
०७१२-२५२१२७६
अखिल भारतीय समन्वित कृषी वनशेती संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर.
बांबू कापणीबाबत नियम ः
१) अविकसित रांजीतून बांबू तोडू नये. ज्या रांजीत दहापेक्षा कमी कळक असतात, त्यांस अविकसित रांजी समजतात. २) वाढीच्या काळात १५ जून ते १५ सप्टेंबरपर्यंत बांबूची कापणी करू नये. ३) दोन वर्षांपेक्षा कमी वयाचे बांबू तोडू नयेत. ४) अर्धवट तुटलेले, वेडेवाकडे, मेलेले कळक प्रथम तोडावे. ५) प्रत्येक नवीन कळक आणि कोवळ्या कळकांना आधार देण्यासाठी आणि भविष्य काळाच्या दृष्टीने प्रत्येक कोवळ्या कळकासाठी दोन या प्रमाणात कमीत कमी आठ प्रौढ कळक प्रत्येक रांजीत सोडलेच पाहिजेत. मूळ खोड उघडे पडू नये किंवा त्यास कुठलीही इजा पोचू नये, यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी : १) रांजीत राखून ठेवलेले कळक हे रांजीत सारख्या अंतरावर राहतील, या दृष्टीने तोड केली पाहिजे. २) कळकांच्या जमिनी लगतच्या पहिल्या कांड्यावर व जमिनीपासून १५ सें.मी. उंचीवर आणि जास्तीत जास्त ४५ सें.मी. उंचीपर्यंत कळक तोडला पाहिजे. ३) तोड ही अत्यंत तीक्ष्ण धारेच्या पात्याने केली पाहिजे. त्याकरिता विशेष प्रकारे तयार केलेले बांबू कापणी विळे वापरावेत. ४) तोडीनंतर सर्व काडीकचरा रांजीपासून दूर केलाच पाहिजे. त्यामुळे कीटक व वणव्यापासून बांबूवनास धोका राहणार नाही.
Source of information
ReplyDelete